Thursday, April 19, 2018

आकाशी झेप घे रे

🔻 अंजली टक्के

हे गाणे ऐकले की वडिलांची आठवण येते . ते नेहमी हे गाणे शिकवायचे .

की आकाशात झेप घ्यायला शिका. आई बाबाच्या लाडात अडकून पडू नका .

दुसरी आठवण त्या picture चीच येते . रवींद्र महाजनी आणि त्याचे शिक्षक . 

शिक्षक असावे तर असे असे नेहमी वाटायचे. 

हे गाणे ऐकताना लहानपणीच्या शिक्षकांची  नेहमीच आठवण येते आनि कृताज्ञेने मन भरून येते .

जसजसे वय वाढले तसे आणि  धकाधकीच्या  आयुष्यात मार्ग काढताना या गाण्याने नेहमीच पाठीवर हात ठेवला आहे .

अगदी कुसुमाग्रजांच्या , तुम्ही फक्त लढ म्हणा ....या कविते इतकीच या गाण्याने साथ दिली आहे.

सोडी सोन्याचा पिंजरा या वाक्याने मळलेली वाट सोडून हवी ती वाट चालायच्या इच्छेला बळकटी दिली.
नोकरीचे रसाळ फळ नाही खावेसे वाटले.

घराचा अर्थ सामाजिक बंधन आणि रुळलेल्या वाटा घेतला आणि त्या तोडायची उर्मी प्रबळ व्हायची .

पंख दिले देवाने ...ऐकतां वडीलानी मनावर बिंबवलेले उतिष्ठत जाग्रत प्राप्य वरांन्नी बोधत ...हे वाक्य मनात निनादत .ते त्यांनी भिंतीवर उंच लिहून ठेवले होते आणि आमच्याकडून पाठ करून घेतले होते.

आणि मग नवीन वाट चालू पडल्यावर, दमून भागून कोलमडताना, कष्टाविन फळ का मिळते याचा अर्थ अनुभवला.

पुन्हा पुन्हा हे गाणे ऐकताना , आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर या गाण्याने साथ दिली तसेच   अधिकाधिक समजत गेले.

आयुष्य जगायची उमेद वाढवत गेले .

कळते परी ना वळते हे तर ब्रिजवाक्य आहे . कळते सगळ्यांनाच , पण वळणे कठीण . हे वळवून घेताना काय कठीण हे अनुभवल्याशिवाय नाहीच समजत .

आणि जेंव्हा एक टप्पा गाठला तेंव्हा शेवटच्या वाक्याचा अर्थ मनात भरला आणि कोणी पाठीवर हात ठेवल्यासारखेच शब्द आहेत ते.

घामातून मोती मिळाले, घर प्रसन्नतेने नटले आणि वडिलांनी कौतुकाचे दोनच शब्द काढले पण आयुष्य भरून पावले.

खरतर या गाण्यामधील प्रत्येक शब्दावर आयुष्यात लिहिण्यासारखे खूप काही आहे .

आणि गाण्याची चाल अभंगासारखी आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा ऐकले तरी कंटाळा येत नाही .
 
फार आशयपूर्ण गाणे .

🌕🌞🌥🌨💦☔🌊🌿🍀🍂🍁🌾💐🌷🌹🌼🌼🌼
 
🔻 दुष्यन्त पाटील
 
माणूस म्हणजे खरंच अजब चीज आहे.. त्याच्या आत किती क्षमता दडलेल्या आहेत ते कुणालाच सांगता येत नाही.. गंमत म्हणजे माणसाला त्याचं बाह्यमन सुखाच्या आरामाच्या मागं धावायला सांगतं. आणि एकदा का माणूस सुखाच्या, ऐषआरामात अडकला की त्याच्या आतल्या लपलेल्या क्षमता लपुनच राहतात, त्या बाहेर पडत नाहीत.. सुखाची, आरामाची, विलासाची ओढ आणि माणसाचा खरा आनंद ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत आणि हे सत्य समजायला काहीसं कठीण आहे.. माणसाचा खरा आनंद त्याच्या आत लपलेल्या प्रचंड क्षमतांना वाट देऊन मोकळं करण्यात आहे..

जीवनातलं समजायला कठीण असणारं क्लिष्ट असं तत्वज्ञान रुपकं, उपमा वापरून ही कवी मंडळी सांगतात.. वर सांगितलेलं क्लिष्ट तत्वज्ञान ह्या गाण्यात सोपं करून सांगितलयं..

‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’

जीवन आकाशासारखं अफाट आहे, आणि त्यात पाखरासारखी उंच झेप घेण्याची क्षमता माणसामध्ये आहे.. पण त्यासाठी सुख आणि विलासाच्या वर वर आकर्षक वाटणाऱ्या सोनेरी पिंजऱ्यातून माणसाला बाहेर पडायला हवं.. तत्वज्ञान, जीवनातलं कठीण तत्वज्ञान सोपं करून सांगण्याची किती छान पद्धत !!

‘तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते  खाया
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा’

चित्रपटातल्या नायकाला वडिलांनी कमावलेली संपत्ती आयतीच मिळते.. आणि  तो ऐशआरामाच्या जाळ्यात अडकतो.. 'सुखलोलुप झाली काया' ह्या शब्दांत त्याचं छान वर्णन केलंय.. पण वडिलांनी कमावलेल्या संपत्तीच्या आसऱ्यात किती दिवस राहायचं?

‘घर कसले ही तर कारा, विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा’

ज्या महालामध्ये माणूस माणसाचं खरं स्वरूप, त्याची खरी क्षमता कायमची बंदी होते तो महाल म्हणजे तुरुंगासारखा आहे.. अशा महालात मिळणारी सारी पंचपक्वानंही विषासमान आहेत.. माणसाची सुखाची, ऐषआरामाची असणारी ओढ त्याला ह्या महालातून बाहेर पडू देत नाही..

‘तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा’

निसर्गानं माणसाला प्रचंड क्षमता दिल्या आहेत.. या क्षमतांची एकदा का त्याला जाणीव झाली की त्याला कुणीच, काहीच अडवू शकत नाही.. एक एक सीमा पार करत तो एखाद्या अथांग ठिकाणी येऊन पोहोचतो..

‘कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा’

सुखाचा सोनेरी पिंजरा सोडून बाहेर जगात झेप घेताना पंख वापरून कष्ट घ्यावे लागतील.. पण जन्मभर पिंजऱ्यात असणाऱ्या पाखराला झेप घेण्याची कल्पना अनुभव नसल्यानं कावरी बावरी करते..

‘घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा’

स्वत:च्या क्षमतांचा वापर करून काहीतरी मिळवणं हा एक अनुभव असतो.. नुसत्याच सुख-विलासातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा खूप उच्च दर्जाचा आनंद हा अनुभव आपल्याला देऊन जातो.. त्यातून मिळणारे समाधान, येणारी प्रसन्नता दैवी असते.. 

क्लिष्ट, खोल तत्वज्ञान कुणालाच न समजणाऱ्या क्लिष्ट भाषेत अचूक सांगणं सोपं असतं.. आणि उथळ गोष्टी सर्वांना समजतील अशा सोप्या शब्दांत सांगायला सोप्या असतात.. पण क्लिष्ट तत्वज्ञान सर्वांना सहज समजतील अशा सोप्या भाषेत सांगणं ही मात्र अवघड कला आहे.. अशी जुनी मराठी गाणी ऐकताना ह्या कलेचा आविष्कार मला दिसतो आणि मी स्तिमित होतो...

श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा’

स्वत:च्या क्षमतांचा वापर करून काहीतरी मिळवणं हा एक अनुभव असतो.. नुसत्याच सुख-विलासातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा खूप उच्च दर्जाचा आनंद हा अनुभव आपल्याला देऊन जातो.. त्यातून मिळणारे समाधान, येणारी प्रसन्नता दैवी असते.. 

क्लिष्ट, खोल तत्वज्ञान कुणालाच न समजणाऱ्या क्लिष्ट भाषेत अचूक सांगणं सोपं असतं.. आणि उथळ गोष्टी सर्वांना समजतील अशा सोप्या शब्दांत सांगायला सोप्या असतात.. पण क्लिष्ट तत्वज्ञान सर्वांना सहज समजतील अशा सोप्या भाषेत सांगणं ही मात्र अवघड कला आहे.. अशी जुनी मराठी गाणी ऐकताना ह्या कलेचा आविष्कार मला दिसतो आणि मी स्तिमित होतो...

🔻 अनिल ताम्हणकर

हा संदेश सर्व तरुणाईला साध्या सोप्या शब्दात कवीने दिला आहे
साधीसोपी चाल, अर्थपूरक प्रवाही संगीत आणि आवाजाला तर तोड नाही.
कोणत्याही गाण्याला किंवा काव्याला सामान्य लोकांच्या ह्र्दयामध्ये स्थान प्राप्त करणाऱ्या गोष्टींचा या गीतामध्ये समसमा संयोग झाला आहे.
या गीतामुळे खूप पिढ्या भारावून गेल्या. अगदी तल्लीन होऊन गेल्या.
आपल्या घरात, आपल्या नातूवाईकांच्या बरोबर सुखासमाधानात राहणारा तरूण निष्क्रीय होऊन जातो.
आपल्या सामर्थ्याची त्याला कल्पना देखील येत नाही आपल्या ठायी असणाऱ्या गुणांचा उपयोग स्वतःसाठी किंवा समाजासाठी कलता येईल हेही तो विसरतो.
आपण तर सामान्य माणसे.
पण प्रत्यक्ष वीर हनुमानालादेखील त्याच्या क्षमतांचा विसर पडला होता.
परंतु एकदा जाणीवा जाग्रुत झाल्यावर काय होतं ते आपण रामायणात पाहिले/ऐकले आहे.
या गीतातील प्यत्येक कडवे हे जाग्रुती निर्माण करणारे आहे.
आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा
कवी सांगतोय तू जो ऐशारामात लोळत आहेस ते सोड आणि आकाशात भरारी घे.
सारं अवकाश तुला कवेत घेण्यासाठी तयार आहे, हा पिंजरा सोडून तू बाहेर पड दिग्विजयासाठी.वैभवाचा त्याग कर आणि अल्पसंतुष्टता सोड.
तू माझं घर, माझी माणसं असे करत राहिलास तर तुझी उन्नती हैणार नाही त्याग कर सर्व सहज साध्य गोष्टींचा.
तुज पंख दिले देवाने,कर विहार सामर्थ्याने
गरुडाला देखील आपल्या पंखांतील  सामर्थ्य काय आहे ते समजण्यासाठी आकाशात भरारी घ्यायला लागते
तू आपल्या सामर्थ्यावर जे यश प्राप्त करशील त्याची गोडी ही ऐदीपणाने मिळालेल्या सुखभोगांपेक्षा कितीतरी पटीने 
मोठी असेल.
खरोखरीच असे प्रेरणादायक 
गीत संयोजकांनी सादर केले त्यांना धन्यवाद.
त्रुप्तीताई योजकस्तत्र दुर्लभः म्हणतात ते काही खोटे नाही

🔻 वृषाली गोखले

याला जीवन ऐसे नांव!
आमची आजी
म्हणायची की,
नोकर म्हणून राबावे,
मालक बनून भोगावे,
आणि आमच्या आईनेही हेच बिंबवले आमच्या मनावर!
आयुष्य उघड्या डोळ्यांनी पहायचं म्हणजे,प्रत्यक्ष मैदानात उतरल्याशिवाय पर्याय नाही,
जीवनाची शाश्वत मूल्ये मनांत रुजण्यासाठी वैभव,खोटी प्रतिष्ठा,
श्रीमंती उपयोगी ठरत नाही,
अपमान सोसावे लागतात,तेव्हांच सन्मान मिळतो
आराम हराम आहे या सिनेमातील, हा नायक अति श्रीमंत आहे,पण त्याला ते सर्व वैभव उपभोगायला मिळते आहे,त्यांत त्याचे कष्ट नाहीत की कसले कर्तुत्वही नाही.
घर कसले ही तर कारा (तुरुंग)बनली आहे जणु त्याच्यासाठी...
सगळी संपत्ती जणु विषच बनलंय त्याच्यासाठी..
कारण फुकट मिळालेल्या पैशातून त्याची व्यसने वाढली आहेत,स्वतःचे कर्तृत्व काहीच नाही..
असतील शिते,सर जमतील भुते हेच त्याचे जीवन बनले आहे,केवळ त्याच्या पैशाकडे बघून,त्याच्या भोवती,मित्र~मैत्रिणींचा गोतावळा आहे.. पण कटु सत्याची जाणीव,त्याचे मास्तर त्याला करून देतात.
ते त्याला कडक शब्दांत,
आकाशी झेप घे रे पाखरा...सोडी सोन्याचा पिंजरा...
""मोहाचे हे बंधन तोड"" असे सांगतात,कवी जगदीश खेबुडकरांनी फार सुंदर शब्द रचना केलीये,ते म्हणतात, तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने,
दरि डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनिया सरिता सागरा..
सोडी सोन्याचा पिंजरा
...सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेला पक्षी हे, समर्पक प्रतीक वापरून,जीवनाच्या अथांग अवकाशात 
श्रमप्रतिष्ठा मिळवायला निघालेला नायक आणि त्याला डोळस मायेने समजावून सांगणारे मास्तर..ते मनांत ठसते.
फुकटचा आराम व आळस याने आयुष्यात  दैन्यावस्था येते..तर मग अशा कष्टाविण मिळालेल्या संपत्तीत लोळत राहून सुखलोलुप होण्यापेक्षा,घराचा उंबरठा ओलांडून बाहेरचे जग बघ.जगाची पारख करून शहाणा हो,अशी प्रेरणा ते मास्तर ,नायकाला देतात.
आणि मग.. नायकाच्या मनांत अपरिवर्तनीय परिवर्तन घडते नि ते प्रत्यक्ष जीवनात ते अवतरते...!
!...मग आनंदी आनंदच...!
एक तळमळीचे,कडक तरीही प्रेमळ आणि  आपला विद्यार्थी  चांगला घडावा, यासाठी व्यथित असलेले शिक्षक देवपूजेस बसलेत व प्रार्थना म्हणून जे गीत गातात,त्यातून हाच संदेश आहे की,
 आराम हराम आहे, कष्टाचेच फळ मधुर आहे...
'घामातून मोती फुलले'
'श्रमदेव घरी अवतरले'
'घर प्रसन्नतेने नटले'
'हा योग जीवनी आला साजिरा!'

ह्या गीताचे शब्द,चित्रपटाच्या दृश्य माध्यमाचा सुरेख वापर आणि रवींद्र महाजनी यांचा सहज सुंदर अभिनय,यामुळे या गाण्याचे अपेक्षित संस्कार मनावर होतातच.
 
🔻 संजय गावडे
 
१९६० च्या दरम्यान...'ते माझे घर' या चित्रपटासाठी गीतकार रवींद्र भट यांनी 'श्रमिक हो घ्या इथे विश्रांती' हे गीत लिहिले.... बाबुजींनी स्वत: संगीत देऊन स्वत:च हे गीत गायलंय...
१९६० म्हणजे भारत कृषीप्रधान देश होता... श्रमप्रधान देश होता..
तेच माझे घर ही संकल्पना आहे...
आणि हे घर म्हणजे मानवतेचे मंदिर आहे... आणि या मानवतेच्या मंदिरात स्थिरावण्यासाठी विनंती केली जात आहे.
इथे विश्रांती घ्या असे श्रमिकांना आवाहन करण्यात येत आहे.
हे जे मंदिर आहे ते समतेचे बंधुत्वाचे आहे...
इथे देव हा पाषाणाचा नसून प्रत्तेकाच्या अंतरात्म्यात वसलेला आहे.
अशा या मंदिरात श्रमिक हो विश्रांती घ्या...
श्रमिकांकडे आर्थिक सुबत्ता नाही....तरी ते परमेश्वराचे लाडके आहेत कारण यांच्या तोंडी मानवतेचे अभंग आहेत आणि हीच मानवता त्यांना कितीही कष्ट पडले यातना झाल्या तरी त्याची विस्मृति घडऊन आणतात...
हे मंदिर म्हणजे संतांनी जी समानतेची भागवत धर्माची पताका रोवली तेच आहे..
इथे उच्चनीचता नाही , जातीभेद नाही..या मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत...मानवता या एकाच छताखाली असलेलं हे घर मंदिरा समान आहे...श्रमिकहो घ्या इथे विश्रांती...
असं हे मानवतेचं महत्त्व सांगणारं गीत लहानपणी दुरदर्शन वर प्रथम पाहीलेलं‌.‌...नंतर अनेक वेळा ऐकलंही... आणि ज्या ज्या वेळी ते ऐकू तेव्हा मानवतेच्या शिकवणीची स्मृती देतच राहीलं...
 

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मैफलउपक्रम

No comments:

Post a Comment