Thursday, April 12, 2018

एक धागा सुखाचा



  • तृप्ती लोणकर
एक धागा सुखाचा
                       हे गाण वाचताना,ऐकताना गाताना कोणाला उजवं ठरवायच आणि कोणाला डावं या बाबत अत्यंत दोलायमान परिस्थिती निर्माण होते.ग.दि.मा  उत्तम म्हटले तर त्याच्या वरचढ. बाबूजी आहेत.त्या दोघांच्या पेक्षा काकणभर सरस राजाभाऊ परांजपे आहेत.
                  हे गाण ऐकून माणूस भावूक होतो.राजाभाऊंनी हे गाण त्यातल्या भावा सहीत निर्विकार.    चेह-याने साकार केल.हे काम महाकठीण. गदिमांचे शब्द म्हणजे  म्हणजे मुळात आभाळाला गवसणी असते. सहृदय माणूस त्यात पूर्णपणे बुडून जातो.या  चित्रपटातील राजाभाऊंची  जी व्यक्तिरेखा आहे ती अगदी "सुखदुःखे समे कृत्वा"  अशा पद्धतीची आहे.ते तुरुंगातही तितक्याच सहजतेने जातात जितक्या सहजतेने बाहेर वावरत असतात.
                  अशा अवलियाच्या तोंडी जीवनाचे तत्वज्ञान अपेक्षित असत.तेच या गाण्यातून दिसत.
  कवी म्हणतात
              एक धागा सुखाचा
               शंभर धागे दुःखाचे
               जरतारी हे वस्त्र माणसा
                तुझिया आयुष्याचे॥
 अायुष्याला वस्त्राची उपमा देण हेच 
एक नाविन्य आहे.हे वस्त्र कस तर सुखाच्या एका चमचमण्-या जरीच्या किनखापी धाग्या बरोबर शंभर दुःखाचे  रया गेलेले धागे एकत्र करून माणूस नावाच एक जरतारी वस्त्र निर्माण केल.त्याच्या आयुष्यात अनेक आनंदाचे,दुःखाचे - निराशेचे - उभारीचे प्रसंग निर्माण केले.अस मानवी अशाश्वत जरतारी आयुष्य विणल गेल आहे.
            पांघरसी जरी कसला कपडा
             येसीउघडा जासी उघडा
             वस्त्रासाठी करीशी नाटक
              तीन प्रवेशांचे.....
या कडव्यात तर कवीच्या कल्पनेची भरारी आणि तत्वज्ञानाची बैठक दिसते. आईच्या गर्भार असणारा तो किंवा ती यांच्या शरीराला स्व नसतो गर्भ नेहमीच. विचारत असतो मी कोण आहे?पण जगात पाऊल टाकताच त्याला त्याच्या शरीराला ममत्वाचे कपडे चढतात.मी अमूक,मी असा,माझ असे,मला हे आवडते,मला श्रेष्ठत्व हवे,मी केले.मी मिळवले.याला कवी कपडे म्हणत आहेत.यातला कोणताही कपडा अंगावर चढला की त्या रंगात माणूस रंगून जातो.पण त्याच वेळी जन्म -मृत्यूच चक्र. आबाधित आहे.हे विसरतो.जन्मला येताना माणसाला स्व ची ओळख नसते.तर मृत्यूपरान्त त्याची ओळख पुसली जाऊन फक्त प्रेत,डेडबाॅडी अशीच रहाते.हे सत्य माहित असता
तो या ओळखीसाठी तीन प्रवेशांच नाटक खेळत असतो.येणारी भूमिका 
तो पार पडतो. तरीदेखील त्या नाटकाचा सूत्रधार तो नसतो
             मुकी अंगडी बालपणाची
             रंगीत वासने तारूण्याची
              जीर्ण शाल मग उरे शेवटी
               येणे वार्धक्याचे.....
वस्त्रांवर प्रकार सांगताना ग.दि.मा. म्हणतात रम्य हवहवस वाटणार बालपण हे म्हणजे मुक्या अंगड्यां टोपड्यां सारखे आहे.प्रत्येकाला ते हव आहे.दुस-यान आपल्याला नटवाव सजवाव त्यांच्या नजरेत आपण असाव जबाबदारी मुक्त सुंदर आयुष्य आहे.पण तुमच्या तोंडात वाचा नाही ते मुक अाहे. बालपणाला स्वत्वाची जाणीव नाही.म्हणूनच ते निर्मळ,मोहक आकर्षक आहे.
                नंतरची स्थिती तारूण्याची हे रंगीत आहे.पैसा,प्रसिद्धी,घर,संसार,मूलबाळ 
 या गुंत्यात अडकवून कधी सुख,कधी दुःख,आनंद,खूषी,तृप्ती  अतृप्ती, विरह - मिलन,  अशा अनेक संमिश्र भावनांच मिश्रण या कालखंडात असत.त्यात मुख्य म्हणजे स्वामित्व भाव हा महत्वाचा मी -माझं -मला -माझ्यासाठी -माझ्यामुळे या रंगीत भावनांनी त्याच  विणकाम. झाल आहे.त्यात स्वकर्तृत्वाचा किनखापी धागा मिसळला असल्याने ते जरतारी झाल आहे.ममत्वाचा रंग त्यावर आहे.
                पुढच्या पायरीवर अाबाधित शाश्वत सत्य ग.दि.मा. सांगतात.ज्या दिवशी जन्म होतो.
त्या दिवशी वार्धक्य येणार शरीर थकणार, मग कसल ममत्व, कसले रंग,ढंग उरते ते फक्त सहजीवन.ज्यात आठवणींच्या जरीच्या तारा असतात तिच ती उबदार शाल पांघरून येणार वार्धक्य.खरोखर किती सुखद कल्पना आहे.जरतारी उबदार वार्धक्य.
      या वस्त्राते विणतो कोण?
       एकसारखी नसती दोन
         कुणान दिसले त्रिखंडातया
          हात विणकराचे.....
 ही आयुष्याची वस्त्रे कोण विणतो?असा प्रश्न कवीला पडतो.हा केवळ कवीलाच नाही तर सगळ्याना हा प्रश्न आहे. तो असतो कुठे?हा विणकर इतका कुशल आहे.की तो वस्त्र विणताना एकाच नमुन्याची दोन विणत नाही.प्रत्येकाचे डिझाईन वेगळे.स्वभाव वेगळे,शरीराची ठेवण वेगळी,मानसिकता वेगळी अशी माणसं आणि त्यांची आयुष्य विणणारा  असा हा विणकर आणि त्याचे हात कोणालाच संपूर्ण तीनही जगात म्हणजे स्वर्ग,मृत्यू,पाताळ या ठीकाणी दिसलेच नाहीत. 
            गीताचा अर्थ जितका सखोल,गंभीर आहे .तितकी ताकदीची गायनाची शैली ही आहे. जडजंबाल तत्वज्ञान सहज सोप करून दिल तरी ते प्रवाही पणे मांडणी एक दिव्य आहे.बाबूजीनी जणू ते तत्वज्ञान पचवून कथेसारख (नॅरेटिव्ह) करून लोकांच्या मनात ठसवल आहे.
        काही वेळा अस वाटत ग.दि.मा.,बाबूजी आणि राजाभाऊ हा मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण त्रिकोण आहे.पण त्याही पेक्षा मी अस म्हणेन
     हे तिघे"हिरकमणिकाञ्चन संयोग आहेत.प्रत्येकाच वेगळे अस्तित्व आहेच पण एकत्रित पणे ते जास्त शोभायमान होतात. कोण श्रेष्ठ,चांगला,उत्तम हे ठरवताना रसिक त्या गाण्यात हरवून जातो
             आसवे गाण जीवनाचे शाश्वत सत्य आहे.
 
  • संजय गावडे
या गाण्या मधे....
मानवी जीवनाचे रहस्य उलगडून दाखवले आहे...
आपण नेहमीच  म्हणतो ...
सुख जवा पाडे , दुःख पर्वता एवढे...
कर्म सिद्धांतानुसार प्रत्येकाला सुख आणि दुःखाची त्याच्या प्रारब्धा नुसार प्राप्ती होत असते...
हे जीवन रुपी वस्त्र विणताना त्यात दुःखाचेच धागे जास्त असतात...पण एखादा जरी सुखाचा धागा असला तरी या जीवनाला आनंददायी बनवतो...
असे हे जरतारी वस्त्र मानवाच्या आयुष्याचे आहे....
आणि हे वस्त्र जरी मानवी जीव आयुष्यभर मिरवत असला त्या साठी खटपट करित असता तरी... त्यासाठी कोणतेच वाईट कर्म करु नये... कारण (आत्मा) जीव जन्माला आला तेव्हा उघडाच होता...त्याच्याकडे ऐहीक संपत्ती नव्हती... आणि जातानाही तो उघडाच जाणार आहे...त्याच्या बरोबर हे इह लोकातले काहीच जाणार नाही...जाणार आहे ती त्याच्या कर्माची गोळाबेरीज...म्हणजेच संस्कार..त्या साठी आपण हे जीवनरुपी तीन प्रवेशाचे नाटक (बालपण , तरुणपण, म्हातारपण..) करताना...असे कर्म केले पाहिजे की मागे काहीतरी कीर्ती रुपी उरावे....
 
आणि शेवटी तर कवी म्हणतोय..
या वस्त्राला कोण विणतो ते दिसत किंवा कळतंही नाही...खरंतर हे वस्त्र प्रत्येकाच्या कर्म  सिद्धांतानुसार विणत गेलेले असते...
आणि प्रत्येकाचे कर्मफल वेग वेगळे असल्यामुळे...प्रत्येकाचे वस्त्र पण वेगवेगळे बनते...या जगातील अगणित वस्त्रांमधे...एकही वस्त्र दुसऱ्या वस्त्रा सारखे नसते...हे सत्य आहे...
 
आणि या गाण्याची निर्मिती  ही बाबुजी आणि गदिमा या जोडगोळीने एकत्र येऊन केल्यामुळे त्यांच्या इतर गीतांप्रमाणे या ही गाण्याने योग्य तो परिणाम साधत...या गीताला अजरामर करुन ठेवलेलं आहे....
 
  • विद्याधर शुक्ल
बाबूजी आणि गदिमा अगदी   ‘’एक दुजे के लिये’’ ! या  जोडीची अनेक गाणी आपण मनात नाहीतर  मोठ्याने जमेल तशी  गुणगुणत आलो आहोत  ...त्यातल हे नेहमी ओठावर येणार गाण ! जीवनाच्या  तत्वज्ञानाच्या   आभाळाच  प्रतिबिंब ५० /६०  शब्दांच्या छोट्या ओंजळीत दाखवण्याच कसब गदिमाच जाणोत  . संतानी  तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी भगवद्गीता , ज्ञानेश्वरी , गीताई  असा प्रवास केला.गदिमांनी गीताईपेक्षाही सोप्या आणि कमी शब्दात ही किमया साधली . बाबुजींनी धीर गंभीर चाल आणि भावनेने ओथंबलेले शब्द यातून गाण्यातल्या तत्वज्ञानाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल.
  आयुष्याच्या तिन्ही  अंकात   सुखाबरोबर चाललेला पाठशिवणीचा  आणि सुख दुःखाचा  उन सावलीचा चालणारा खेळ हे एक वास्तव आहे .हे वास्तव अनेकदा जाणवत असल तरी “एक धागा ......” सारख्या गाण्यांनी हा विचार समग्रपणे  आणि मनाला भिडेल अशा रीतीने समोर येऊन आपल्याला  अंतर्मुख करतो . मला वाटत या मानसिक अवस्थेत   या  वास्तवाकडे   आपण कस बघतो हे महत्वाच आहे . ‘’अस होणारच’’ हे  आपण मनापासून स्वीकारू शकलो नाही तर सुखाच्या धाग्यानाही आपण पारखे होऊ शकतो .स्वीकार केला तर सुखाच्या क्षणांचा आनंद तर उपभोगता येतोच पण दुखाची धार पण नक्की कमी होते . दुसर अस की आपण बर्याच वेळा दुखाचे प्रसंग बहिर्गोल भिंगातून पाहून मानसिक त्रास वाढवून घेतो .पण  दुःख अंतर्गोल किंवा बहिर्गोल दोन्हीही   भिंगे न वापरता सध्या काचेतून पाहणे  शक्य झाले तर आपण सुख निर्देशांक वाढवू  शकतो . तिसर म्हणजे अनेकदा दुख आपणच ओढवून घेतलेला असत .आपल्या हातात आहे ते न केल्यामुळे निर्माण झालेलं ! प्रयत्नवादातूनही दुखाचे काही धागे कमी करता येन शक्य असत .
या गाण्यातून  जीवनाच वास्तव निरखाव ...स्वीकाराव आणि प्रयत्न करून दुखाचे धागे जमतील तेवढे कमी करावेत एवढच  वाटत .
 
  • डॉ.वृंदा कार्येकर
मी हे गाणं ऐकून त्या आधारे माझे विचार कवितेतून मांडलाय. पूर्वीची आहे . तीच पाठवते,  दुःखावर मी लिहीन ,लिहायचेच आहे ,ती ऊद्याची पोस्ट .

एक धागा दु्ःखाचा
 शंभर धागे सुखाचे 
सुतीच साधे वस्त्र  
आहे माझिया आयुष्याचे .
 
ह्या वस्त्राचे मोल, अमोल 
विरळ काही,  सुबक सुंदर   
जरीही नाही दिसला विणकर
शोध तयाचा घेते .
 
पांघरेन मी कोणतेही वस्त्र
माझिया पुढती थिटेच अस्त्र
मुक्ती साठी घडते नाटक 
अनेक हे जन्मांचे .
 
सर्वच पथ ते असती खडतर 
राजदैवी पथ तो सुलभ खरोखर 
पथावरून त्या मीच चालते 
दिसले घर ते त्याचे  .
 
रेंज आता आली म्हणून ऊशीर .
 

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मैफलउपक्रम
 
 
 

No comments:

Post a Comment